02 जुलै 2026
आनंदी आयुष्याचा मंत्र स्वीकारा : डॉ. तांबारे रिक्षाचालकांसाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम
व्यसनमुक्त राहणे ही केवळ स्वतःची नव्हे, तर कुटुंब आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसले पाहिजे. पैसे तर मिळतीलच, पण त्याचबरोबर शुभआशीर्वादही मिळविण्याचा प्रयत्न करा, असे भावनिक आवाहन बार्शीच्या आयुष इन्स्टिट्यूट फॉर अॅडिक्शन मॅनेजमेंटचे डॉ. संदीप तांबारे यांनी केले.
नशामुक्त भारत अभियान आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व जिल्हा
परिषदेच्या समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रिक्षाचालकांसाठी
व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महासंघाकडून
हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
अध्यक्षस्थानी संयुक्त महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद होते. यावेळी डॉ. संदीप तांबारे यांनी आपल्या सहज, विनोदी आणि प्रभावी शैलीत व्यसनाचे दुष्परिणाम, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे फायदे उलगडून सांगितले. डॉ. मृणालिनी मोरे, अॅड. द्वारका देवळे यांनीही व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी आणि कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केले. संयुक्त महासंघाच्या सोलापूर शहरातील विविध रिक्षा स्टॉपवरील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केले.